
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम आणि लोकप्रिय चेहरा असणारे मंत्री मा. नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी नेहमीच ओळखले जातात .केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री असलेले नितीन गडकरी यांचा दावा असा आहे की, लोकसभा निवडणुकी नंतर त्यांना विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी ती ऑफर नाकारली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याने ही ऑफर दिली होती, पण या पदाची मला इच्छा नाही असे सांगून मी ती नाकारली असे गडकरी म्हणाले . या त्यांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक भाष्य केलेले आहे. गडकरी यांनी जे सांगितलं आहे त्यावरून गडकरींची लोकप्रियता असल्याने त्यात काही चुकीचं असाव असं मला वाटत नाही असं राऊत यांनी म्हटलं आहे .भाजपातील सर्वमान्य असे नेते गडकरी असल्याने पंतप्रधान पदासाठी असे जर त्यांना कोणी विचारले असेल तर ते चुकीचं असेल असं मला वाटत नाही . कारण या देशात दहा वर्षापासून हुकूमशाही आणि एकाधिकारशाही सुरू आहे . दहा वर्षापासून ज्याप्रमाणे एक प्रकारची आणीबाणीच पुकारल्याचे चित्र आहे. त्याच्याशी तडजोड करू नका अशी भूमिका जर एखाद्याने गडकरींना सांगितली असेल तर गडकरींनी त्याबद्दल विचार का करू नये असे ते म्हणाले. यावेळी गडकरींनी असं सांगितलं होतं की , मी कुणाचे नाव घेणार नाही . ज्यांनी मला पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देण्याबद्दल कळवले त्यांना विचारले की तुम्ही मला का पाठिंबा देत आहात ? आणि मी तुमचा पाठिंबा का म्हणून घ्यावा ? पंतप्रधान होणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही. मी माझी मूल्य विचार आणि संघटना याच्याशी प्रामाणिक आहे मी कुठल्याही पदासाठी पक्षाशी गद्दारी करणार नाही. मला माझ्या मुल्यांवर विश्वास आहे भारतीय लोकशाहीचा आधार असलेली ही मुल्ये आहेत असे गडकरी यांनी सांगितले . परंतु गडकरींनी ही चर्चा कोणाशी झाली हे मात्र कळू दिलेलं नाही . गडकरींच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण देशभरात सर्वपक्षीय आणि भाजपा या सर्वांमध्येच एक वेगळीच चर्चा आणि उलट सुलट शंका कुशंकांनी थैमान घातलाय हे मात्र नक्की !